कोल्हापूर : ‘भौतिकवादी युगात माणसांचा एकमेकांशी संवाद कमी होत चालला असून, परिणामी नैराश्य आणि विकृतीत वाढ होत आहे. अशा काळात मानसशास्त्रविषयक लेखनाला जगभरात मागणी वाढत आहे. या पार्श्वभूमीवर, डॉ. अश्विनी पाटील यांची पुस्तके भविष्याचा मानसशास्त्रीय वेध घेण्यास दिशादर्शक ठरतील,’ असा विश्वास शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी व्यक्त केला.
शिवाजी विद्यापीठातील मानसशास्त्र विभागात कार्यरत असलेल्या डॉ. अश्विनी पाटील यांनी लिहिलेल्या ‘दैनंदिन मानसशास्त्र’ आणि ‘रिझिलियन्स ऑफ अडोलसन्स’ या मराठी आणि इंग्रजी पुस्तकांचे प्रकाशन कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.
कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, ‘मानसशास्त्र विभागाच्या वतीने समूह संवादाचे उत्कृष्ट मॉडेल तयार करावे आणि ते विद्यापीठाला सादर करावे. त्यामुळे विद्यार्थी, शिक्षकांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होईल. त्याचप्रमाणे व्यक्तिगत जीवनातही नात्यातील विश्वास हा कृतीतून सिद्ध करून दाखवावा. सदैव सकारात्मक राहावे. आई-वडिलांशी संवाद स्थापित करावा आणि वास्तववादी जीवनाची अभ्यासक्रमाशी सांगड घालून आयुष्य आनंदमय बनवावे.’
या वेळी जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मानसशास्त्र विभागात विभिन्न विषयांवरील पोस्टर प्रदर्शनाचे आयोजनही करण्यात आले होते. विभागप्रमुख डॉ. भारती पाटील यांनी प्रास्ताविक केले, तर डॉ. अश्विनी पाटील यांनी आभार मानले. या वेळी प्रा. अमोल कांबळे यांच्यासह विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.